जळगाव – जिल्ह्यातील ‘‘ अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंबांनी आनंदाचा शिधा उपक्रमाचा लाभ घ्यावा. दिवाळी कीटपासून कोणीही वंचित राहणार नाही , याची जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदारांनी काळजी घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आनंदाचा शिधा – दिवाळी किट वितरणाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आणि यांचे हस्ते संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. पाळधी येथील रास्त भाव दुकानदार सोपान पाटील रास्त भाव दुकान क्र. 24 यांच्या दुकानातील लाभार्थ्यांना पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते दिवाळी शिधाजिन्नस संच चे ( दिवाळी किट ) वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळीच्या निमित्ताने नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा संच शंभर रुपयात वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळी किट वितरणाचे वाटप जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले.
जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिका धारकांना दिवाळी शिधाजिन्नस संचाचा लाभ घेता यावा तसेच जिल्हा प्रशासनाने सज्ज राहून गरिबांची दिवाळी गोड करावी. त्या-त्या तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी यांनी त्यांच्या कार्य क्षेत्रांत रास्त भाव दुकानातून दिवाळी कीटचे सुयोग्य वाटप होत आहे किंवा नाही याबाबत तपासणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी अमन मित्तल, यांनी महसूल प्रशासनाला दिले आहे.जिल्ह्यातील 6,20,650 शिधापत्रिकांसाठी दिवाळी शिधाजिन्नस संचाचा पुरवठा शासनाकडून होत आहे. या जिन्नसांचा पुरवठा झाल्यावर लगेच रास्त भाव दुकानदारांपर्यंत संच पाठविले जात आहे.रास्त भाव दुकानांमार्फत या शिधाजिन्नसांचे वाटप करण्यात0 येईल. दिवाळी किटचे वाटप ई-पॅास मशिनद्वारे करण्याच्या शासनाने सूचना दिल्या आहेत.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमन मित्तल होते .जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सूर्यवंशी, धरणगावचे तहसिलदार नितीन देवरे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी , जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे आणि पाळधी येथील रास्त भाव दुकानदार , लाभार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सूर्यवंशी यांनी केले. तर आभार नितीन देवरे यांनी मानले.