शासनाने जळगाव शहरातील रस्ते कामांसाठी ४२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १४ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
त्या निधीतून किती कामे झाली आहेत, याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड ( Vidya Gaikwad ) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र देवून मागितली असल्याचे सांगण्यात आले.
शासनाने जळगाव शहरातील ४९ रस्त्यांच्या कामासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला मंजूर केला आहे. मात्र, त्याचे काम शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. शासन महापालिकेला पैसे पाठवित आहे. महापालिका झालेल्या कामांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी देत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मक्तेदाराकडून काम करून घेत आहे.
रस्त्यांच्या कामासाठी आतापर्यंत महापालिकेने १४ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा निधी मक्तेदारास दिला आहे. मक्तेदाराने त्या निधीतून रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. निधी खर्च झाल्याने पुढील कामांसाठी मक्तेदाराने निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकडे निधीची मागणी केली आहे, तर महापालिका शासनाकडे मागणी करणार आहे. मात्र, नवीन निधी देण्याअगोदर शासनाने १४ कोटींतून काय कामे झाले याची माहिती मागवित आहे.
त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी १४ कोटींच्या निधीतून किती कामे झाली याची माहिती द्या, असे पत्र दिले आहे. मात्र, अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या पत्रास उत्तर दिले नसल्याचे सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, मक्तेदाराने ४९ रस्त्यांपैकी ३५ रस्त्यांची कामे केली आहेत. त्यापैकी २७ रस्त्यांचे बीएमचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर आता कारपेट टाकण्याचे काम बाकी आहे. आता पुढील काम करण्यासाठी त्यांना निधी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.